दिवाळखोर बिल्डरच्या संपत्तीत गुंतवणूकदारांचाही वाटा
- केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली – घर खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बिल्डर दिवाळखोरीत निघाल्यास त्याच्या संपत्तीत अशा गुंतवणूकदारांचाही वाटा असेल, ज्याला बुकिंगनंतर घराचा ताबा मिळालेला नाही. गुंतवणूकदाराला किती वाटा द्यायचा, ते संबंधित बिल्डरच्या कर्जावर अवलंबून असेल.
याबाबत केंद्रीय कॅबिनेटमध्ये अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरावर कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर हा बैठकीतील चर्चेचा मुद्दा असेल, असे बोलले जात होते. मात्र त्यावर चर्चा करण्यात आली नाही.
सध्याच्या कायद्यानुसार बिल्डर दिवाळखोरीत निघाल्यास त्याच्या संपत्तीवर पहिला हक्क बॅंकांचा असतो, ज्या बॅंकांकडून बिल्डरने कर्ज घेतलेले आहे. मात्र पैसे भरुनही ज्या ग्राहकांना घराचा ताबा मिळालेला नाही, त्या ग्राहकांना तसेच वाऱ्यावर सोडले जाऊ शकत नाही, असे समितीचे म्हणणे आहे.
या समितीच्या म्हणण्यानुसार, दिवाळखोर बिल्डर किंवा त्याची कंपनी विकून किती पैसे मिळतील, त्यामधून किती वाटा गुंतवणूकदारांना द्यायचा याचा निर्णय विविध निकषांवर घेतला जाईल. बिल्डरकडून किती पैसा वसूल करायचे आणि किती घर खरेदीदारांना पैसा मिळाला नाही आणि त्यांचे किती देणे आहे, ते सर्वात अगोदर निश्चित करण्यात येईल. या सर्व विश्लेषणानंतर खरेदीदारांना पैसे देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यासाठी बॅंक आणि तज्ञांचा सल्ला घेऊन अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, असे समितीचे मत आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे ग्रेटर नोयडासह देशातील विविध शहरात दिवाळखोरीत निघालेल्या बिल्डरकडे अडकून पडलेल्या हजारो खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तीन मापदंड निश्चित
अर्थ मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बिल्डर घर खरेदीदारांकडून पैसे घेतात आणि दुसऱ्या कंपनीसाठी तो पैसा लावतात. प्रोजेक्टला उशीर झाल्यास बिल्डरकडे पैसा कमी पडतो आणि ग्राहकांना घराच्या ताब्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. असे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. त्यामुळे दिवाळखोरी कायद्यांतर्गत तीन मापदंड निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये कंपनीसोबत चर्चा करून समस्या सोडवण्यासाठी एक ठराविक कालावधी दिला जाईल. कंपनीने चर्चा न केल्यास एका ठराविक कालावधीनंतर त्याची संपत्ती जप्त केली जाईल. किंवा कंपनीने स्वतःहूनच दिवाळखोरीत असल्याचे जाहीर केल्यानंतर सर्व संपत्ती जप्त करून त्याची विक्री करण्यात येईल.