दिल्लीतील विवाद संपुष्टात – आयएएस अधिकारी केजरीवाल यांच्याशी चर्चेस तयार
नवी दिल्ली – दिल्लीतील राज्यसरकार आणि आयएएस अधिकारी यांच्यतील विवाद संपुष्टात आला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या आवाहनानुसार आयएएस अधिकारी सरकारशी चर्चेस तयार झाले आहेत.
दिल्लीतील आयएएस अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचे स्वागत करत आहेत. आम्ही पूर्ण समर्पणाने आणि जोमाने आमचे कार्य करू. आमची सुरक्षा आणि प्रतिष्ठा याकडे पूर्ण लक्ष देण्यात यावे. मुख्यमंत्र्याशी आम्ही औपचारिक चर्चेस तयार आहोत, असे आयएएस अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
रविवारी केजरीवाल यांनी दिल्ली आयएएस अधिकारी संघटनेला लोकनियुक्त सरकारवर टाकलेला बहिष्कार काढून घेऊना पुन्हा काम सुरू करण्याचे आवाहन केले होते आणि त्यांच्या सुरक्षा आणि सुरक्षितता याबद्दल त्यांना खात्री दिली होती.
एका अधिकृत बैठकीत दिल्लीचे चीफ सेक्रेटरी अंशू प्रकाश यांच्यावर एका आप आमदाराने हल्ला केल्यानंतर सरकार आणि आयएएस अधिकारी यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते.
माझे पूर्ण अधिकार आणि उपलब्ध संसाधने वापरून त्यांच्या पूर्ण सुरक्षिततेची आणि संरक्षणाची मी खात्री देतो. ते माझे कर्तव्यच आहे. असाच विश्वास मी मला भेटायला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांना यापूर्वीही दिलेला आहे. अधिकारी हे आमच्या परिवाराचा हिस्सा आहेत. असे सांगून केजरीवाल यांनी त्यांना बहिष्कार बंद करून कामास सुरुवात करण्याचे रविवारी आवाहन केले होते.