दत्ताकाकांवरील प्राणघातक हल्ल्याच्या कटाचा शिवसेना, मनसेकडून निषेध
- वैयक्तीक द्वेशापोटी हल्ले घडविण्यापर्यंत विरोधकांची मजल
- मानवतेच्या दृष्टीकोणातून प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न अत्यंत गंभीर
पिंपरी, (महाईन्यूज) –चिखलीतील दत्ताकाका साने यांचे जनसंपर्क कार्यालय फोडण्यासाठी आलेल्या तरुणांना काकांवर प्राणघातक हल्ला करायचा होता, असा संशय बळावत चालला आहे. या प्रकरणाला पोलिसांकडून वेगवेगळी दिशा मिळत आहे. राजकीय द्वेश अथवा सुडाची भावना मनात ठेवून हल्ल्याचा कट रचण्यापर्यंत पातळी ओलांडली जात असेल मानवतेच्या दृष्टीकोणातून हे अत्यंत गंभीर आहे. भविष्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरणार नाही, अशी भावना व्यक्त करत शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे आणि मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी या घटनेचा निषेध केला.
- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखलीतील जनसंपर्क कार्यालयाची चार दिवसांपूर्वी तोडफोड करण्यात आली. गुन्हेगारांना केवळ तोडफोड करायची नव्हती, तर त्यांना काकांवर प्राणघातक हल्ला करायचा होता. कार्यालयाची तोडफोड करून काकांच्या फोटोवर कोयत्याने फुलीचे निषाण सोडून गुन्हेगार पसार काढले. याचे चित्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. पुरावा म्हणून पोलिसांच्या हाती ते देण्यात आले आहेत. परंतु, पोलिसांकडून कधी प्रेमप्रकरण तर कधी कार्यालयातील मुलांसोबतचे वैर असल्याचा मुलामा देत या घटनेला वेगळीच दिशा देण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे विरोधकांनी सुध्दा दत्ताकाका साने यांच्या पाठीशी उभे राहून या कृत्याचा जाहीर निषेध केला आहे.
राहूल कलाटे म्हणाले की, विरोधी पक्षनेते दत्ता साने असतील किंवा त्यांच्याजागी अन्य कोणीही व्यक्ती असेल. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन गुन्हेगारीचा आधार सुडाची भावना व्यक्त करण्यासाठी घेतला जात असेल तर ते निंदणीय आहे. जर घातपात झाला तर गुन्हेगारी कृत्याच्या पाठीमागील सुत्रधाराला बळ मिळणार आहे. त्याच्या मनातील गुन्हेगारी कृत्याची भावना चेतवली जाऊन त्यात तरुण भरडले जाण्याची भिती आहे. कारण, काकांच्या कार्यालयावरील हल्ल्यातील गुन्हेगार हे 18 ते 23 वयोगटातील दिसतात. जरी ते गुन्हेगार असतील तर अशा घटनांमुळे त्यांना पुन्हा उद्विग्न होण्यास प्रवृत्त केले जाईल. त्यामुळे पोलिसांनी जातीने या प्रकरणात लक्ष घालून ख-या सुत्रधाराला शोधून काढले पाहिजे.
- सचिन चिखले म्हणाले की, राजकीय द्वेशापोटी असेल अथवा गल्लोगल्लीतील तरुणांमधील भांडण. यात तरुण वर्ग गुन्हेगारीच्या दिशेने जात आहे. सुडाची भावना मनात ठेवून असे हल्ले घडवले जात आहेत. राजकीय क्षेत्र सोडले तर दैनंदीन जीवनामध्ये देखील अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत चालल्या आहेत. त्याला आळा घालण्याची नितांत गरज आहे. एखाद्या राजकीय नेत्यावर हल्ला झाल्यास त्यातील गुन्हेगाराला पुढे प्रोत्साहन मिळणार आहे. या गुन्हेगारीतून तरुणांची सुटका करण्यासाठी पोलिसांनी पाऊले उचलावीत.
दत्ता साने म्हणाले की, गुन्हेगार कोणत्याही टोळीचा असो, मला त्याचे देणेघेणे नाही. या घटनेमागील ख-या सुत्रधाराची माहिती आपल्याला मिळाली पाहिजे. गुन्हेगाराला चेतवून त्याला हे कृत्य करायला भाग पाडले आहे. पोलीस गुन्हेगाराला योग्य शासन करतील. परंतु, जो व्यक्ती अशा कृत्याला खतपाणी घालतो आहे. त्याला मुळासह उखडून काडण्यासाठी कायद्याचा उपयोग झाला पाहिजे. अन्यथा वीशीतली तरुण पिढी गुन्हेगारी कृत्याकडे वळून बरबाद होईल, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांचा शोध सुरू आहे. पोलीस तापासात सर्व गोष्टी निष्पन्न होतील. यावर माझा विश्वास आहे.