त्रिपुरामध्ये 24 बांगलादेशी तरूणांना अटक
- दहशतवादी संघटनेशी लागेबांधे असल्याचा संशय
आगरतळा –त्रिपुरामध्ये आज 24 बांगलादेशी तरूणांना अटक करण्यात आली. त्यांचे एखाद्या दहशतवादी संघटनेशी लागेबांधे असल्याचा संशय बळावला आहे.
काही संशयास्पद व्यक्तींची माहिती मिळाल्यावर त्रिपुरा पोलिसांच्या मोबाईल टास्क फोर्सने (एमटीएफ) आगरतळा रेल्वे स्थानकावर छापा टाकला. या कारवाईवेळी दिल्लीतून आलेल्या बांगलादेशी तरूणांना पकडण्यात आले. त्या सर्वांकडे बनावट आधार कार्डे सापडली. पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश आणि तामीळनाडूमधून त्यांनी आधार कार्डे मिळवली. पोलिसांनी आधार कार्डांची ऑनलाईन छाननी केल्यावर ती बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
काही बांगलादेशी तरूणांकडे ओळखपत्रेही सापडली. ती देशाच्या विविध मदरशांमधून जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली. तीन तरूणांकडे बांगलादेशी पासपोर्ट होते. मात्र, त्यांची मुदत खूप आधीच संपली आहे. त्यांच्याकडे कुठलीही वैध कागदपत्रे आढळली नाहीत. बांगलादेशी तरूणांची अटक विविध यंत्रणांनी गांभीर्याने घेतली आहे. त्या तरूणांची उद्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (एआयए) पथक चौकशी करणार आहे. याशिवाय, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडूनही त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.