‘त्या’ बेपत्ता तरुणाचा मित्रांनीच केला खून ; दोघांना अटक
पिंपरी – पैशांच्या वादातून वाकड येथील त्या बेपत्ता तरुणाचा दोघा मित्रांनी रुमालाने गळा आवळून खून केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच मृतदेह कोणालाही ओळखता येऊ नये म्हणून जाळून टाकला.
तेजस सुनील भिसे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण सुनील भिसे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, आरोपी मित्र दत्ता नवनाथ बिरंगळ आणि समाधान बिभीषण भोगल या दोघांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तेजस भिसे याने आरोपी मित्र दत्ता बिरंगळ याला मैत्रिणीच्या फ्लॅटवर कर्ज घेऊन २० लाख ऊसणे दिले होते. काही महिन्यांनी मयत तेजसच्या मैत्रिणीकडे बँकांनी तगादा लावला असता तेजसने संबंधित आरोपी दत्ता बिरंगळ याच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. मात्र, तो अनेकदा पैसे मागून देखील देत नव्हता. याच व्यवहारातून त्यांच्यात वाद झाले होते. मयत तेजस जुन्या गाड्यांचे खरेदी विक्रीचे काम करायचा. हत्या होण्याअगोदर तेजस बाहेरगावी जातो म्हणून घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने आरोपी दत्ता बिरंगळ सोबत जात असल्याचे मावस भाऊ नितेशला फोनद्वारे सांगितले. आरोपी दत्ता बिरंगळ आणि समाधान भोगल यांनी मयत तेजसला होंडा सिटी मोटारीतून जामखेड येथे नेऊन रुमालाने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह जाळला.
दरम्यान, आरोपीनेच मयत तेजसच्या मोबाईलवरून व्हाट्सऍपद्वारे मावस भाऊ नितेश ला स्वतः तेजस आल्याचे भासवत होंडा सिटी गाडी काळेवाडी येथे चावीसह सोडल्याचा मेसेज केला. ते तेव्हापासून तेजसशी संपर्क न झाल्याने सोबत असलेल्या दत्ता बिरंगळशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याचा फोन बंद येत असल्याने त्याने घातपात केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मयत तेजसच्या भावाने याची माहिती वाकड पोलिसांना दिली. आणि वाकड पोलिसांनी आरोपी दत्ता आणि समाधान या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनीच तेजसचा खून केल्याचे कबुल केले.