“..त्यांच्या कमरेत हाणायला पाहिजे”; दानवेंवर टीका
देशभरात कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. पण भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी तर या आंदोलनाचा संबंध थेट चीन व पाकिस्तानशी जोडून नवा वाद ओढवून घेतला आहे. या त्यांच्या विधानानंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करताना तोल सुटला. शेतकऱ्यांचा अवमान करणारे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड आहेत, अश्या शब्दात विजय वडेट्टीवार यांनी जहरी टीका केली.
शेतकऱ्यांचा अपमान करणारे रावसाहेब दानवे येडपट आणि भैताड आहेत. हे भैताड राजकारणात कसं आलं माहीत नाही. कार्टुन जसे वागतात तसेच हे वागत आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी दानवेंवर केली. बच्चू कडू यांनी सांगितल्याप्रमाणे दानवेंच्या कमरेत डावा किंवा उजवा घातला पाहिजे. त्यांच्या कमरेत हाणायला पाहिजे, असं धक्कादायक विधानही त्यांनी केलं.
वाचाः आपल्याला शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा घेऊन पुढे जावू या – शरद पवार
यापुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांचा अनादर करणाऱ्या व्यक्तीला भाजपमध्ये मंत्री केलं जातं; त्यामुळे भाजपची किव येते, असे म्हटले आहे. भाजपला काहीस कसं वाटत नाही. त्यांना लाज वाटत नाही का? केंद्रीय गृहमंत्री शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. मग शेतकरी जर पाक आणि चीनचे असतील तर त्यांच्याशी चर्चा तरी कशाला करता? असा सवालही त्यांनी केला.