“तेव्हा फडणवीसांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का?” अशोक चव्हाणांचा तिरकस सवाल
मुंबई : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने मेगाभरती करणार नाही, अशी भूमिका मांडली, तेव्हा त्यांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का? तेव्हा तर कोरोना नव्हता” असा सवाल बांधकाम विकास मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी विचारलेला आहे. फडणवीसांनी मेगाभरतीवरुन केलेल्या टीकेला चव्हाणांनी उत्तर दिले आहे. “विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल चुकीचं विधान केलं. सरकारने नोकरभरती बंद करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. आम्ही कोरोनामुळे भरती प्रक्रिया थांबवली आहे. हा जीआर काल काढलेला नाही, 4 मे रोजी काढला आहे” असे चव्हाणांनी स्पष्ट केलेले आहे.
“देवेंद्र फडणवीस यांनी काल बोलताना, 15 सप्टेंबर 2020 पर्यंत भरती न करण्याची राज्य सरकारची भूमिका मनाला वेदना देणारी असल्याचे म्हटलेले होते. परंतु डिसेंबर 2018 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने आम्ही मेगाभरती करणार नाही, अशी भूमिका मांडली तेव्हा त्यांच्या मनाला वेदना झाल्या नाहीत का? तेव्हा तर कोरोना पण नव्हता” असा सवाल अशोक चव्हाण यांनी विचारला आहे.