तेलंगणाच्या निकालावर काँग्रेसने व्यक्त केला संशय; निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार
तेलंगणात पुन्हा एकदा के. चंद्रशेखर राव यांची तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. सध्याच्या अंदाजानुसार, टीआरएसने सर्वाधिक ९० जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने या निकालांवर संशय व्यक्त केला आहे. इव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली असून त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे काँग्रेस नेते उत्तमकुमार रेड्डी यांनी म्हटले आहे.
रेड्डी म्हणाले, मला या निकालांवर संशय आहे. यासाठी आम्ही व्हीव्हीपॅटमशीमधील मतदानाच्या स्लिप तपासणार आहोत. कारण आम्हाला इव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा संशय आहे. आम्ही सर्व काँग्रेसचे नेते निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारही करणार आहोत. कारण, टीआरएसचे नेते मतमोजणी आधीच निवडणूक कोण हारणार हे कसं सांगू शकतात.
विधानसभेसाठी सिरसिला येथून टीआरएसचे केटी रामा राव, बांसवाडा येथून श्रीनिवास रेड्डी आणि अदिलाबादमधून जोगू रमन्ना आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे रेवांत रेड्डी पुढे आहेत. तर एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी हे निवडून आले आहेत. हैदराबादमध्ये टीआरएसच्या सदस्यांनी सातत्याने आघाडी घेतल्याने जल्लोष करायला सुरुवात केली आहे.