तुषारपुढे रेल्वेची दैना
मुंबईला पहिल्या डावात १०४ धावांची आघाडी
वेगवान डावखुरा गोलंदाज तुषार देशपांडेने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ‘अ’ गटातील लढतीत रेल्वेचा पहिला डाव ३०७ धावांत गुंडाळला. याबरोबरच्या मुंबईने पहिल्या डावात १०४ धावांची आघाडी मिळवला. तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात मुंबईने दोन फलंदाजांच्या मोबदल्यात ५७ धावा केल्या आहेत.
तुषारने प्रथम श्रेणी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना ७० धावांत सहा गडी बाद केले. त्यामुळे रेल्वेचा संपूर्ण संघ १०४.२ षटकांत ३०७ धावांवर गारद झाला. रेल्वेतर्फे अरिंदम घोषने सर्वाधिक ७१ धावांचे योगदान दिले. अविनाश यादव (४८) आणि हर्ष त्यागी (३९) यांनीसुद्धा कडवा प्रतिकार केला. मात्र तुषारच्या माऱ्यापुढे त्यांचे प्रयत्न अपूरे पडले.
दुसऱ्या डावात मुंबईने जय बिस्ता (६) आणि आशय सरदेसाई (१५) यांना लवकर गमावले. मात्र अखिल हेरवाडकर आणि सिद्धेश लाड यांनी अनुक्रमे २४ व १३ धावांवर नाबाद राहत मुंबईची आघाडी १६१ धावांपर्यंत नेली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : ११५.२ षटकांत सर्वबाद ४११
रेल्वे (पहिला डाव) : १०४.२ षटकांत सर्वबाद ३०७ (अरिंदम घोष ७१, अविनाश यादव ४८; तुषार देशपांडे ६/७०
मुंबई (दुसरा डाव) : २५ षटकांत २ बाद ५७ (अखिल हेरवाडकर २४; हर्ष त्यागी १/७).