तिरुपती बालाजी मंदिरात शतकोटीचा घोटाळा
पुजाऱ्याचे मुख्यमंत्र्यांवर आरोप
हैदराबाद (आंध्र प्रदेश) – भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत. आणि हे आरोप मंदिराचे मुख्य पुजारी रमन्ना दीक्षितुलु यांनी केले आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू मंदिराच्या निधीचा दुरुपयोग करतात असे त्यांचे म्हणणे आहे. रमन्ना दीक्षितुलु यांच्या आरोपांनंतर त्यांचीच मुख्य पुजारीपदावरून हकालपट्टी करण्याता आली आहे. तिरुपती बालाजी मंदिराला मिळालेल्या देणग्या आणि ईश्वरचरणी अर्पण केलेले पैसे आणि वस्तू यांचा दुरुपयोग केला जातो.
स्वत: मुख्यमंत्री मंदिराच्या प्रशासकांची नियुक्ती करत असल्याने त्यांची मनमानी चालते असे रमन्ना दीक्षितुलु यांनी सांगितले आहे. ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे प्रसाद बनवण्याचे काम चालते, त्या स्वयंपाकघराची मोडतोड करून कोट्यवधी रुपयांची आभूषणे आणि जडजवाहिर गायब करण्यात आले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी मंदिराची 100 कोटी रुपये राजकीय कारणांसाठी वापरल्याचाही आरोप रमन्ना दीक्षितुलु यांनी केले आहेत.
रमन्ना दीक्षितुलु यांनी केलेल्या आरोपांनंतर आंध्र प्रदेशातील राजकारणात खळबळ माजली आहे. पैसा आणि सत्ता यांच्यासाठी चंद्राबाबू नायडू यांची असलेली हाव या साऱ्या प्रकारातून दिसून येते आहे, असे आंध्र प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षानेते जगमोहन रेड्डी यांनी म्हटले आहे.