तारा टाकण्यासाठी परवानगी घ्या, अन्यथा कारवाई
- रेल्वे हद्दीतील पुलांच्या सुरक्षेबाबत पश्चिम रेल्वेला उशिराने जाग
मुंबई : अंधेरीतील गोखले उड्डाणपुलावरील एका पादचारी मार्गिकेचा भाग रेल्वे रुळावर कोसळण्यासाठी त्यामधून मोठय़ा प्रमाणात गेलेल्या तारा (केबल) जबाबदार असल्याचेही प्रथमदृष्टया समोर आले होते. अशा केबल्स टाकताना रेल्वेची परवानगी संबंधित घेत नसल्याने यापुढे रेल्वेची परवानगी आवश्यक असल्याचे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अन्यथा कारवाईचा इशाराही दिली आहे.
अंधेरीतील गोखले उड्डाणपुलावरीलच एक पादचारी मार्गिका रेल्वे रुळावर कोसळल्याची घटना नुकतीच घडली. यामध्ये पाच जण जखमी झाले. यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला. ४७ वर्षांपेक्षाही जुन्या असलेल्या या पुलामधूनच मोठय़ा प्रमाणात खासगी कंपनीच्या केबल्स टाकण्यात आल्या होत्या. त्यातच पेव्हर ब्लॉकही मार्गिकेवरुन टाकण्यात आले होते. त्याचा मोठा भार पुलावर पडत असल्याने पूल कोसळण्यासाठी प्राथमिकदृष्टय़ा केबल्सच जबाबदार असल्याचे समोर आले. मात्र या घटनेची रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून चौकशी केली जाणार असून सादर होणाऱ्या अहवालातूनच नेमके कारण पुढे येईल. गोखले उड्डाणपुलावरील दुसरी पादचारी मार्गिकाही धोकादायक असून सध्या ती बंद करण्यात आली आहे.
पुलांमधून किंवा त्यावरुन केबल्स टाकण्यासाठी रेल्वेची कोणतीही परवानगी घेण्यात येत नाही किंवा अशी कामे करताना परवानगी घेतलीही जात नाही. त्यामुळे रेल्वेला या कामांची माहितीच नसल्याचा भोंगळ कारभार उघडकीस आला. अखेर उशिराने जाग आलेल्या पश्चिम रेल्वेने आता नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यांसदर्भात अतिरिक्त अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (इन्फ्र)कन्हैया झा यांनी अंधेरीतील घटनेनंतर रेल्वे हद्दीतील पुलांवर केबल्सचा येणारा भार पाहता यापुढे रेल्वे प्रशासनाकडून संबंधितांना आवश्यक परवानग्या घ्याव्या लागतील, असे स्पष्ट केले. याआधी रेल्वे हद्दीत येणाऱ्या पुलांवर केबल्सचे किंवा अन्य काम करताना रेल्वेची परवानगी घेण्यात येत नव्हती. मात्र ही परवानगी आवश्यक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि तसे न केल्यास संबंधितांवर कारवाईदेखिल केली जाणार असल्याचे झा यांनी सांगितले. सध्या गोखले उड्डाणपुलावरील धोकादायक असलेली दुसरी पादचारी मार्गिका लवकरच पाडण्यात येणार असून त्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.