…तर शिवसेनेत उभी फूट पडेल – रामदास आठवले
नागपूर – आगामी निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेत युती न झाल्यास शिवसेनेत उभी फूट पडेल, असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवेसनेला दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय शांती व समता परिषदेत आठवले बोलत होते. याप्रसंगी रामदास आठवले यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दित युतीवरही त्यांनी हे भाकित केले. गेले अनेक वर्षे एकमेकांच्या सोबतच निवडणूक लढवणाऱ्या दोन्ही पक्षांनी युती करावी, अशी अपेक्षा असल्याचेही आठवले म्हणाले. मात्र, जर शिवसेनेने युती करण्याचे नाकारले तर शिवसेनेचे अनेक आमदार पक्षाची साथ सोडतील, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भाजपसोबत युती करण्याची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा शिवसेनेच्या नेत्यांची असल्याची माहितीही आठवले यांनी दिली. याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतही बोलणे केले आहे, असे आठवले म्हणाले. ऍट्रॉसिटी कायद्याला धक्का देण्याचे केंद्र सरकारचे कोणतेही विचार नाहीत. उलट ऍट्रॉसिटी कायद्याला आणखी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत असल्याचा उल्लेख आठवले यांनी केला. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना नोकरीच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण कायम राहावे यासाठीही केंद्र सरकार कायद्यात बदल करु शकते, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आगामी सर्व निवडणुका शिवेसना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मेळाव्यात केली होती. शिवाय स्वबळावर निवडणूक लढणार, या निर्णयापासून माघार घेणार नाही, असे नाशिकमधील पत्रकार परिषदेत म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.