…तर ती मते राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला मिळाली असती – छगन भुजबळ
मुंबई : वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिले नसते तर ती मते काँग्रेस – राष्ट्रवादीला मिळाली असती. आता ही तूट मनसे आणि शेतकरी संघटनेच्या मतांनी भरुन निघेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
भुजबळ एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा काँग्रेस – राष्ट्रवादीला होणारच आहे. राज ठाकरेंसोबत यापूर्वी झालेल्या वादांवरही छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे. यापूर्वी राज ठाकरेंनी माझ्या घणाघाती टीका केली होती. मी देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. राजकारणात असे होतंच राहते. हे वैर विसरुन आम्ही पुढे आलो आहोत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंच्या मनसेचे नाशिकमध्ये मतदार आहेत, राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत ठाम भूमिका घेतली नसती तर ती मते सैरभैर झाली होती. यातील काही मते शिवसेना तर काही मते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असती. पण राज ठाकरेंनी भाजपाविरोधी भूमिका घेतल्याने ही मते आता आघाडीच्या पारड्यात पडतील, असा अंदाज भुजबळ यांनी व्यक्त वर्तवला आहे.
बाळासाहेबांविषयी आदर
राज ठाकरेंच्या सभेचे वेगळेपण असून त्यांच्याविषयी मतदारांमध्ये आकर्षण असते, अशा शब्दात भुजबळ यांनी राज यांचे कौतुक केले आहे. राज आणि मी एकमेकांवर टीका केली. निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकल्यावर असे आरोप प्रत्यारोप होतात. पण यामुळे वैयक्तिक संबंध तोडले जातात, असे नाही. माझ्या मनात बाळासाहेबांविषयी असलेला आदर कमी झाला नाही. आमच्यातील प्रेम आणि जिव्हाळा कायम होता, असेही भुजबळ यांनी सांगितले.