तंत्रज्ञानाने जीवनाशी संबंधित सर्व घटकांमध्ये बदल केला- पंतप्रधान
- शेर-ए-कश्मिर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रतिपादन
नवी दिल्ली – तंत्रज्ञानाने जीवनाशी संबंधित सर्व घटकांमध्ये बदल घडवून आणले असून, देशातील युवक या बदलांशी जुळवून घेत आहेत, असे पंतप्रधानांनी दीक्षांत समारंभात सांगितले. कृषी क्षेत्रातही शेतकऱ्यांच्या हितासाठी तंत्रज्ञानाचा समावेश करुन नवीन संस्कृती विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.
जम्मूमधील शेर-ए-कश्मिर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नोलत होते. अन्य एका समारंभात त्यांनी पकुलडुल ऊर्जा प्रकल्प आणि जम्मू रिंगरोडची पायाभरणी केली. तसेच माता वैष्णोदेवी देवस्थानच्या ताराकोटे मार्ग आणि मटेरियल रोप-वे चे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्दिष्टाने केंद्र सरकारची धोरणे आणि निर्णय पुरक असतात. वैज्ञानिक दृष्टीकोन, तांत्रिक नाविन्यता तसेच संशोधन आणि विकासाच्या माध्यमातून पदवीधर विद्यार्थी कृषी क्षेत्राला एका लाभदायक उपजीविकेत परिवर्तीत करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
एका जलऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन आणि त्याच दिवशी तशाच दुसऱ्या प्रकल्पाची पायाभरणी करण्याचा आजचा दिवस विशेष असल्याचे, पंतप्रधानांनी पकुलडुल प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभात सांगितले. देशाच्या अविकसित भागांचा विकास करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
ताराकोटे मार्गाच्या माध्यमाने माता वैष्णोदेवी देवस्थानला भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पर्यटन, विशेषत: अध्यात्मिक पर्यटन हा जम्मू आणि कश्मीर राज्यातील उत्पन्न वाढवण्याचा एक महत्वपूर्ण स्रोत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.