ढेकणं झाली म्हणून घर जाळायचं नसतं : राजू शेट्टी
पुणे : ‘घरात ढेकणं झाली म्हणून घर जाळायचं नसत’असे उदाहरण देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कृषी ‘कायद्यांविरोधातील आंदोलन हे शेतकऱ्यांचे नव्हे तर बाजार समित्यातील अडत्यांचे आहे, असा आरोप काही जण करत आहेत. पण हे आरोप जे करत आहेत त्या संघटना ह्या सरकारधार्जिण्या आहेत. बाजार समित्यांमध्ये सर्व काही आलबेल आहे असे आमचे म्हणणे नाही. पण बाजार समितीच्या प्रचलित पध्दतीत पैसे कमी मिळत असले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची हमी आहे. यामुळे बाजार समितीतील कायदे कडक करून ते अधिक सक्षम केले पाहिजेत’,असे शेट्टी म्हणाले. बाजार समितीसह खुल्या बाजाराला परवानगी देणे म्हणजे, बाजार समित्या दुबळ्या करणे व कालांतराने त्या बंद करणे हा या कायद्यांमागील उद्देश असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
अवश्य वाचाः भारत बंद; हा कोणताही राजकीय बंद नाही – संजय राऊत
चंद्रकांत पाटील हे लोकशाहीची उदाहरणे देत असतील तर त्यांनी, प्रथम कृषी कायदे मंजूर करताना हरकती व सूचना का मागविल्या नाहीत याचे स्पष्टीकरण द्यावे असेही ते म्हणाले.
कांदा निर्यातीबाबत बोलताना, पिका-पिकात दुजाभाव न करता जसे ऊस पिकाला हमी भाव मिळतो तसा इतर पिकांनाही हमीभाव निश्चित केला पाहिजे, असे मत देखील शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले.