Uncategorized
ठेकेदारांची बिले अडवून भाजप उगवतोय राजकीय सूड – योगेश बहल
पिंपरी: अंदाजपत्रकात तरतूद असलेल्या आणि काम पूर्ण झालेल्या कामांची बिले अदा करण्याचे 31 मार्चपूर्वी लेखा विभागाने बंद केले आहे. परंतु, ज्या कामांना रितसर मंजुरी आहे. कामे पूर्ण झाली आहेत आणि ज्या कामांसाठी पैशांची तरतूद आहे. त्या कामांची बिले अडविता येत नाहीत. मात्र, पालिकेतील लेखा विभागाच्या प्रमुखांनी भाजपच्या एका पदाधिका-याला हाताशी धरुन बिले अडविल्याचा आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला आहे.
विरोधी पक्षेनेते योगेश बहल यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्र देऊन विकास कामे झालेली बिले देण्याची मागणी केली आहे.
पूर्ण झालेल्या कामांची बिले अदा करण्याचे 31 मार्चपूर्वी महापालिकेच्या लेखा विभागाने बंद केले आहे. पंरतु, ज्या कामांसाठी पैशाची तरतूद आहे. त्या कामांची बिले देणे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, महापालिकेच्या लेखा विभागाच्या प्रमुखांनी भाजपच्या एका पदाधिका-याला हाताशी धरून महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 102 च्या तरतुदीचा फायदा उचलत सर्वसामान्य जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रकार चालविला आहे. तब्बल 150 ते 200 कोटींची विकास कामे केलेल्या ठेकेदारांची बिले अडविली आहेत, असे बहल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
टक्केवारी उकळण्यासाठी आणि नवीन भ्रष्टाचाराचे कुरण निर्माण करण्यासाठी हा सर्व प्रकार चालविला जात आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून बिले अदा करण्याची पद्धत ठरलेली आहे. ज्या कामांना तरतूद आहे ती बिले 15 एप्रिलपर्यंत अदा केली जात होती आणि हीच पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित आहे. राज्याच्या संपूर्ण महापालिकेत याच पद्धतीने कामकाज चालते.
महापालिकेची निवडणूक असल्यामुळे दोन ते अडीच महिने पालिकेचे अधिकारी कामात व्यस्त होते. बिले तयार करणे, अदा करणे आदी कामे पालिका प्रशासनाकडूनच झाली नाहीत. यामध्ये पालिका प्रशासनाचा दोष आहे. तरीही इतरांना नाहक त्रास देण्याचा प्रकार लेखा विभाग प्रमुख आणि भाजपच्या पदाधिका-याने चालविला असल्याचे बहल यांनी म्हटले आहे.
सत्तेतील भाजपच्या काही पदाधिका-यांच्या सुपीक डोक्यातून निघालेली ही कल्पना केवळ टक्केवारीची नसून जनतेच्या करावर दरोडा मारण्याची तयारी आहे. अत्यंत विकृती आणि स्वार्थी मानसिकतेतून हा प्रकार घडवून आणला जात आहे. यातून स्वत:ची तुंबडी भरली जाणार हे निश्चित आहे. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात या कामांची तरतूद करून त्यांना पुन्हा स्थायी समितीपुढे आणण्याचा घाट घातला जात आहे. या प्रकारातून पैसे लाटण्याचे नवीन कुरण निर्माण केले जाणार आहे, असेही ते म्हणाले. पारदर्शी कारभाराच्या नावावर सत्ता काबीज करणा-या भाजपचा दिवसा-ढवळ्या पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.