ट्रम्प-किम भेटीपासून भारतानेही बोध घ्यावा
- शाहबाज शरीफ यांची भारताला सूचना
लाहोर – उत्तर कोरिया आणि अमेरिका या दोन कट्टर शत्रु देशांमध्येही काल सिंगपुरला शांतता चर्चा झाली. त्यापासून बोध घेऊन भारतानेही पाकिस्तान बरोबर शांतता चर्चा सुरू करावी अशी सूचना पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख शाहाबाज शरीफ यांनी भारताला केली आहे. शाहबाज हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधु आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की कोरियन युद्धानंतर दोन्ही कोरियांमध्ये मोठे शत्रुत्व निर्माण झाले होते.
उत्तर कोरियाच्या अण्विक कार्यक्रमामुळे थेट अमेरिकेलाही धोका निर्माण झाला होता. इतके कमालीचे वैमनस्य असूनही उत्तर कोरिया व अमेरिका दक्षिण कोरियाशी चर्चा करण्यास तयार झाले. आता आपल्या प्रदेशातही शांततेसाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे भारत आणि पकिस्तान या दोन्ही देशांनी आता काश्मीर प्रश्नांवर एकमेकांशी चर्चा सुरू केली पाहिजे. भारताने आता मागिल इतिहास उगाळत बसण्याऐवजी आता नवीन सुरूवात केली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. शाहबाज शरीफ हे आता पाकिस्तानच्या निवडणुकीत पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून पुढे आहेत त्यामुळे त्यांच्या भूमिकेला महत्व आहे.
येत्या 25 जुलैच्या निवडणूकीत आपला पक्ष सत्तेवर आला तर आम्ही प्रादेशिक शांततेला अधिक महत्व देऊ. भारताबरोबरच्या शांतता चर्चेबरोबरच अफगाणिस्तानातही शांतता प्रस्थापित होण्याची गरज आहे. त्याकडेही आंतरराष्ट्रीय समुदयाने आता लक्ष केंद्रीत केले पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात मांडली आहे.