ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा सर्वत्र, पण रेवनाथची चर्चाच नाही: राजू शेट्टी
नाशिक: “एक अभिनेता ज्याने गांजा घेतल्याचं म्हटलं जातं, त्या अभिनेत्याच्या आत्महत्येची चर्चा, पण दुधाला भाव मिळालेला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या रेवनाथ काळेच्या आत्महत्येबद्दल चर्चा नाही, हे दुर्दैवी आहे”, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केलेली आहे. गेले काहीदिवसांपासून दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर शेतकरी संघटनेकडून आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झालेली नाहीये.
“आमच्यासाठी गुन्हे नवीन नाहीयेत. आणखी एका गुन्ह्याची भर, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढलेला आहे. मोर्चात गायीचा छळ केल्याचा आरोप हास्यास्पद आहे. कितीही गुन्हे दाखल करा आंदोलन करणार”, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलेले आहे. “सरकारने 6 एप्रिल पूर्वी दूध संघाचं संकलन आणि नंतरचे संकलन याचे ऑडिट करावं. उत्पादकांच्या नावावर सरकारचा दूध केंद्रांवर डल्ला”, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. देवाची पूजा करणारा शेतकरी आज संकटात सापडला आहे. देऊळ, मंदिर, मस्जिद उघडण महत्वाचा नाही, असंही राजू शेट्टी म्हणालेले आहेत.
नुकतेच राजू शेट्टींसह 40 आंदोलकांवर बारामतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुधाच्या भुकटीच्या आयात बंदी आणि दूध दर वाढ दिली जात नसल्याच्या निषेधार्थ राज्य सरकार विरोधात मोर्चा काढलेला होता. परंतु, मोर्चाला परवानगी नसताना देखील कोरोना काळातील नियमांचं उल्लंघन करत गर्दी जमवल्याच्या आरोपावरुन बारामतीत राजू शेट्टींवर गुन्हा दाखल झालेला आहे.