जो उत्साह दारु दुकाने उघडताना दाखवला, त्याच्या अर्धा तरी मंदिरं उघडण्यासाठी दाखवा : देवेंद्र फडणवीस
सांगली | “कोरोनाबाबत आम्ही सहकार्याची भूमिका घेतली आहे. सरकारकडूनही प्रो अॅक्टिव्ह रोल असला पाहिजे. धार्मिक स्थळं उघडली आणि कोरोना वाढला असे आतापर्यंत कुठेही घडलेलं नाही,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे. त्याबाबत कोल्हापूर आणि सांगलीत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
“प्रशासनापेक्षा शासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. शासन ज्या पद्धतीने चालते, त्याच पद्धतीने साधारणत: प्रशासन पुढे जात असते. सरकार आणि मंत्री लक्ष घालतील, तेव्हाच निर्णय प्रक्रियेला वेग येईल. आपली कार्यक्षमता लपवण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवलं जातं आहे. त्यामुळे निर्णय मातोश्रीवरुन घ्या किंवा वर्षावरुन घ्या. धार्मिक स्थळं उघडली आणि कोरोना वाढला असं कोठेही घडलेलं नाही, असे फडणवीस म्हणाले. सुशांत सिंह प्रकरणात आम्हाला विनाकारण ओढण्याचा प्रयत्न होतो आहे,” असेही त्यांनी सांगितले.