जोखीम पत्करून सेवा देणाऱ्या पोलिसांना ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे: गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई। महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोनाशी लढा देत देशभरातले डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय इतर आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस राबत आहेत. जोखीम पत्करून सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्याच धर्तीवर पोलिसांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याची विनंती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
देशभरासह महाराष्ट्रातील पोलिसही दिवसरात्र जोखीम पत्करून, जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. नाक्यानाक्यावर, गल्लोगल्ली, महामार्गांवर पोलिसांनी गस्त वाढवली असून नाकाबंदी केली आहे. प्रत्येकाला विचारणा करण्यात येत आहे. योग्य कारण असल्यास पोलिस नागरिकांना जाऊ देत आहेत. तसेच वेळोवेळी जनजागृतीही करत आहेत. दिवसाचे २४ तास पोलिस रस्त्यांवर आपल्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांच्याही आरोग्याची काळजी सरकारने घेतली पाहीजे. हे लक्षात घेऊन पोलिसांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची मागणी आहे.