‘जेएनयू’ कुलगुरू हकालपट्टीच्या मागणीवर विद्यार्थी ठाम
नवी दिल्ली | महाईन्यूज
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) कुलगुरू एम. जगदेश कुमार यांच्या हकालपट्टीची मागणी तीव्र झाली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने गुरुवारी शेकडो विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. या मोर्चेकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर मंत्रालयासमोरच विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. ‘जेएनयू’मधील हल्ल्याच्या निषेधार्थ सलग चार दिवस विद्यापीठाच्या आवारात आंदोलने सुरू होते. गुरुवारी मात्र विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय असलेल्या शास्त्री भवनावर मोर्चा काढला होता. या मोर्चाची सुरुवात मंडी हाऊस येथून झाली होती. त्यात माकपचे नेते सीताराम येचुरी, वृंदा करात, भाकपचे नेते डी. राजा, ज्येष्ठ नेते शरद यादव आदी सहभागी झालेले होते. मात्र, या मोर्चाचे नेतृत्व ‘जेएनयूएसयू’च्या अध्यक्ष आइशी घोष यांनी केले आहे. रविवारी झालेल्या हल्लय़ात हल्लेखोरांनी घोष यांना जबर मारहाण केली. विद्यार्थ्यांचा मोर्चा पोलिसांनी ‘जेएनयू’च्या आवारातच अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक विद्यार्थी मंडी हाऊसपर्यंत पोहोचले व इथून प्रचंड बंदोबस्तात मोर्चा काढण्यात आला आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अमित खरे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची घोष यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. कुलगुरू कुमार यांची तात्काळ हकालपट्टी करावी, ही विद्यर्थ्यांची प्रमुख मागणी केलेली होती. पण, कुलगुरूंना हटवणे हा जेएनयूमधील हल्लय़ावर उपाय नसल्याचे खरे यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय राजकीय मुद्दय़ांवर हस्तक्षेप करत नाही, असेही खरे यांनी विद्यर्थ्यांना सांगितले. मात्र, कुलगुरूंच्या हकालपट्टीच्या मुद्दय़ावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे घोष यांनी पत्रकारांना सांगितले. त्यानंतर हीच मागणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संध्याकाळी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.