जामखेडमधील हत्या जुन्या वादातून, ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
अहमदनगर – नगर जिल्ह्यातील जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात यांची हत्या ही गतवर्षी राजकीय फलक लावण्यावरून झालेल्या वादातून घडल्याचे समोर येत आहे. मृत योगेशचा भाऊ कृष्णा राळेभात याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी गोविंद दत्ता गायकवाड याच्यासह इतर ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ही हत्या राजकीय वैमनस्यातून नव्हे तर वैयक्तिक वादातून झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, जामखेडमध्ये हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश अंबादास राळेभात (वय ३०) आणि राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.२८ एप्रिल) सांयकाळी सव्वा सहाच्या दरम्यान बीड रस्त्यावरील वामन ट्रेडर्ससमोर घडली होती. सुरूवातीला राजकीय वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात होते. परंतु, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत ही हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली आहे. योगेशचा भाऊ कृष्णा याच्या तक्रारीनंतर गोविंद दत्ता गायकवाडसह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जामखेडमध्ये हत्येच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच केडगावमध्ये दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती.