जातीय नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण हवे – राज ठाकरे
पुणे – जातीय निकषांवर नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेले पाहिजे. सरकार तुमच्या भावनांशी खेळ करते आहे त्यांच्या आश्वासनांना आणि राजकारणाला बळी पडू नका अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. मराठा समाजाने ज्या प्रकारे मोर्चे काढले त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. मात्र राजकारण्यांच्या राजकारणाला बळी पडू नका. हकनाक स्वतःचा जीव गमावू नका असे आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केले.
मनसेचा मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला. त्यामध्ये त्यांनी आपली ही भूमिका मांडली. आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर अनेक प्रश्न सुटतील असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे. सरकार फक्त राजकारण करते आहे, पक्ष कोणताही असो. त्यांच्या राजकारणाला भुलू नका असे आवाहनही त्यांनी केले. सरकार लोकांच्या भावनांशी खेळ करत आहेत असाही आरोप राज ठाकरेंनी केला.
काकासाहेब शिंदे या मुलाने नदीत उडी मारली. अशा प्रकारच्या घटना टाळा, जीव गमावून काहीही होणार नाही. जातीच्या आधारावर आरक्षण दिले तर जातीय तेढ निर्माण होईल. एका जातीला आरक्षण दिले तर दुसऱ्या जातीला द्यावे लागेल. मराठी मुला-मुलींनी या मागचे राजकारण काय सुरू आहे ते समजून घ्या असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.
मी इथे काही होर्डिंग्ज पाहिली. गुरू पौर्णिमा मेळावा, या मेळाव्याचा गुरु पौर्णिमेशी काहीही संबंध नव्हता. ही होर्डिंग्ज पाहूनच मला चित्र समोर आले की मी गंध लावून आशीर्वाद देत बसलो आहे की काय? या दिवसाचा आणि मेळाव्याचा काहीही संबंध नाही. मेळावा घ्यायचा होता म्हणून मेळावा घेतला. अशी टीका करत पुण्यात होर्डिंग लावणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही शेलक्या शब्दात राज ठाकरेंनी झापले. मी इथे गुरुमंत्र वगैरेही काहीही देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
एवढेच नाही तर त्यांनी मराठी खासदारांवरही त्यांनी कडाडून टीका केली. मराठी खासदार आपल्या मराठी मुलांसाठी, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी काहीही करताना दिसत नाहीत. संसदेत आवाज उठवत नाहीत. मंत्री, नेते तुमचा वापर करत आहेत, तुमचे घर उभे राहिले पाहिजे, संसार उभा राहिला पाहिजे यासाठी कोणीही काम करताना दिसत नाहीत अशीही टीका राज ठाकरेंनी केली. रोज खोटे बोलायचे, खोटे वागायचे हे सरकारचे धोरण झाले आहे अशीही टीका राज ठाकरेंनी केली.
थावरसिंग गेहलोत नावाचे केंद्रीय मंत्री आहेत. सामाजिक न्याय आणि सबलीकरण हे खाते त्यांच्याकडे आहे. त्यांनी लोकसभेत माहिती दिली की, सरकारी रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत आणि खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी वाढल्या आहेत. केंद्रातला मंत्री जर ही माहिती सांगत असेल तर तुम्ही कशासाठी भांडता आहात? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला. राज्यातल्या नोकऱ्या नेमक्या जातात कुठे? महाराष्ट्रातल्या दलित बांधवांना, मराठा समाजाला किंवा इतर कोणत्याही समाजाला कळत नसेल तर खासगी क्षेत्रात सर्वाधिक नोकरीच्या संधी आहेत त्या संधी मिळतात कुणाला? असाही प्रश्न राज यांनी उपस्थित केला.
माझा बाहेरच्या राज्यातल्या तरूणांनी इथे नोकरी करणाऱ्याला विरोध नाही. मात्र भूमिका इतकीच आहे की आधी मराठी मुलांची-मुलींची पोटं भरली पाहिजेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. असे घडत नसल्याने आंदोलन करावे लागते आहे. ९० टक्के स्थानिक मुलांना-मुलींना नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजेत म्हणजे त्यांना असे आंदोलन करावेच लागणार नाही असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.