जाणून घ्या काय आहे निपाह व्हायरस?
नवी दिल्ली : देशात जीवघेणा व अत्यंत दुर्मिळ निपाह विषाणूच्या(Virus) संसर्गामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्यानं घबराट पसरली आहे. केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह विषाणू जलद गतीनं पसरत आहे. या विषाणूमुळे येथील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी 25 जणांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये निपाह विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरणारा निपाह हा गंभीर संसर्गजन्य विषाणू आहे. यास NiPah Virus Encephalitis (Encephalitis म्हणजे मेंदूला आलेली सूज) असंही म्हटलं जातं. या संसर्ग फळ-फुलांद्वारे होतो. खजुराचे उत्पन्न घेणाऱ्या लोकांमध्ये या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती समोर आली आहे. 2004 साली या विषाणूमुळे बांगलादेशातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले होते.
* निपाह विषाणू संसर्गाची लक्षणे
* रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो.
* मेंदूमध्ये जळजळ होते.
* मेंदूला सूजदेखील येण्याची शक्यता असते.
* ताप, डोकेदुखी, चक्कर येणे.
* डॉक्टरांनुसार काही प्रकरणांमध्ये योग्य वेळेत निदान किंवा उपचार न झाल्यास रुग्ण कोमामध्ये जाण्याचीही शक्यता असते.
– कशी घ्याल स्वतःची काळजी?
निपाह विषाणूवर अद्यापपर्यंत प्रभावी लस उपलब्ध झालेली नाही. या विषाणूची लागण होऊ नये यासाठी फळं विशेषतः खजूर खाणं टाळले पाहिजे. जमिनीवर पडलेली फळं खाणं शक्यतो टाळलं पाहिजे. आजारी डुक्कर तसंच अन्य प्राण्यांपासून दूर राहिले पाहिजे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीलाही याचा संसर्ग होतो. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.