जवानास जन्मठेप ; पत्नीचा गळा आवळून खून
पुणे – पत्नीचा गळा आवळून खून करून तिने आत्महत्या केल्याचे भासविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सैन्यात कार्यरत असणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश आर.व्ही.अदोने यांनी हा आदेश दिला आहे.
लान्स नाईक गंगादत्त लिलाधर तिवारी (रा. घोरपडी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने पत्नी रश्मी (वय 29) यांचा 20 फेब्रुवारी 2012 रोजी सकाळी आठच्या सुमारास राहत्या घरी गळा आवळून खून केला होता. या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनचे तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर ज्ञानदेव थोरात यांनी फिर्याद दिली होती. तिवारी याने किरकोळ कारणावरून चिडून यांचा दोरीने गळा आवळून खून केला. मात्र, हा खून पचविण्यासाठी पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव त्याने केला होता. खुनानंतर तो बाथरुममधील खिडकीद्वारे बाहेर पडला आणि त्यानंतर दार तोडून पुन्हा घरात गेला होता. हा सर्व प्रकार झाल्यानंतर तो तीन वर्षांच्या मुलाला आणि पत्नीचा मृतदेह बेडवर ठेवून घर बंद करून पसार झाला होता. जाताने त्याने एका सहकाऱ्याला फोन करून “पत्नीने आत्महत्या केली असून मी बोलण्याच्या मनस्थित नसल्याने निघून जात आहे,’ असा निरोप दिला होता. घटनेनंतर दोन ते तीन दिवसांतच पोलिसांनी त्याला अटक केली होती.
खून झाल्याचे उघड झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करून तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते यांनी दोषारोपत्र सादर केले होते. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील लिना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी 11 साक्षीदार तपासले. रश्मी यांच्या कुटुंबातील दोन व्यक्ती फितूर झाल्यानंतरही न्यायालयाने वैद्यकीय पुराव्यांच्या आधारावर शिक्षा सुनावली