जलसंपदा मंत्र्याला जबाबदार धरून शेतकऱ्याची आत्महत्या
पुणे- शेतीसाठी कालव्यातून पाणी मिळत नसल्यामुळे विहिरीत उडी मारून शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. वंसत पवार असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पवार हे इंदापूर अर्बन बँकेचे संचालकही आहेत. त्यांनी आत्म्हत्या करताना एक चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे हे आपल्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख आहे.
पवार यांनी त्यांच्याच घराजवळ असणाऱ्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. शेतीला पाणी मिळत नसल्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आपल्या मित्रांनी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, असाही उल्लेख पवार यांनी चिठ्ठीत केला आहे. तसेच गतवर्षी व चालू वर्षी नीरा डाव्या कालव्यातून उन्हाळी हंगामात पाणी वेळेत न मिळाल्यामुळे आत्महत्येस जबाबदार असणारे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी चिठ्ठीत केली आहे.
रविवारी सकाळी पवार यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदारवस्ती जवळील विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगत असल्याचा दिसून आला. याप्रकरणी पुढील तपास वालचंदनगर पोलिस करीत आहेत.