जयराम रमेश :- मोदींना कोणीतरी सत्यकथन करणारा मिळावा
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी तरी सत्य सांगणारा माणूस मिळायला हवा आहे अशी भावना माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी व्यक्त केली आहे. इंदिरा गांधी आणि पी. एन. हक्सर यांच्यावर त्यांनी लिहीलेल्या पुस्तकाचे प्रकाशन काल त्यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी त्यांनी ही भावना व्यक्त केली. नोटबंदी हा तुघलकी निर्णय होता अशा सारखी माहिती मोदींना कोणीतरी स्पष्टपणे सांगितली पाहिजे असे ते म्हणाले.
पी. एन हक्सर हे तत्कलिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रिसिंपल सेक्रेटरी होते. सन 1967 ते 73 या काळात त्यांनी हे पद भुषवले होते. त्यांच्यावरील पुस्तक लिहीताना तुम्हाला नेमका काय धडा मिळाला असा प्रश्न यावेळी जयराम रमेश यांना विचारण्यात आला होता त्याला उत्तर देताना रमेश म्हणाले की, तुम्ही जर पंतप्रधान असाल तर तुमच्या भोवती केवळ होयबा लोकांचा घोळका असता कामा नये. जे लोक सत्य सांगत नाहींत त्या लोकांची तुमच्या भोवती गर्दी असता कामा नये हा महत्वाचा धडा आहे.
हक्सर आणि इंदिरा गांधी यांच्यातील कार्यपद्धतीविषयी बोलताना ते म्हणाले की हक्सर हे त्यांचे असे एक सचिव होते की जे इंदिराजींना त्यांचा एखादा निर्णय चुकीचा आहे की योग्य आहे त्याविषयी ते स्पष्टपणे अभिप्राय देत. सत्तेवर असलेल्यांना तुमचा नोटबंदीचा निर्णय तुघलकी स्वरूपाचा आहे असे त्यांना सांगणारे कोणी तरी हवे होते असे मतही त्यांनी मोदींचे नाव न घेता व्यक्त केले. हक्सर हे त्यांच्या काळातील सर्वांत शक्तीशाली सनदी अधिकारी होते. ते इंदिरा गांधींशी कधीही ढोंगबाजीने वागले नाहीत.