जगातील कोणतीच ताकद भारताची जमीन बळकावू शकत नाहीः राजनाथ सिंग
नवी दिल्ली | लडाख सीमेवरील तणावावर चर्चा करून उपाय काढता येऊ शकतो. त्यासाठी काही विवादित मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. त्याला यश किती येईल हे माहीत नाही. परंतु मी खात्रीने एवढेच सांगू शकतो की, जगातली कोणतीच ताकद भारताची एक इंचसुद्धा जमीन बाळकावू शकत नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज येथे सांगितले.
चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी लडाखला भेट दिली. तेव्हा जवानांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. लडाख दौर्यावर जाण्यापूर्वी जनरल बिपिन रावत आणि लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्यासोबत ते लेहला गेले होते. त्यानंतर संरक्षणमंत्री लडाखला गेले व तेथे त्यांनी भारतीय जवानांशी संवाद साधला.
भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन आठवड्यांपूर्वी (3 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लडाखचा दौरा केला होता. त्यापाठोपाठ चीनसोबत तणावानंतर संरक्षणमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा आहे. दौर्याच्या पहिल्या दिवशी राजनाथ सिंह लडाखमध्ये असतील, तर शनिवारी ते जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरला जातील.
या दौऱ्याबाबत ट्विटरवरून माहिती देताना राजनाथ सिंह यांनी म्हणाले होते, ‘दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौर्यावर रवाना होत आहे. मी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही भागांना भेटी देईन. सीमा भागात तैनात सशस्त्र दलाच्या जवानांशी संवाद साधणार आहे.’