चोरी करण्यासाठी गटारातून भुयारी मार्ग
पायधुनी पोलिसांकडून दोघांना अटक
मुंबई : पायधुनी परिसरातील एका दुकानात चोरी करण्यासाठी चोरटय़ांनी थेट गटारातून भुयारी मार्ग काढत दुकानात चोरी केली. मात्र इतकी मेहनत करूनही मुख्य तिजोरी उघडता न आल्याने चोरटय़ांना चिल्लर आणि दुकानातील काजू-बदमावरच समाधान मानावे लागले. त्यानंतर काही दिवसांतच या चोरटय़ांना पायधुनी पोलिसांनी बेडय़ा घातल्या.
मूळचे झारखंड येथील राहणारे आलम शेख (वय २८) आणि बादुस शेख (वय २२) हे दोन्ही आरोपी झटपट श्रीमंत होण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. एखाद्या मोठय़ा ठिकाणी हात मारून घबाड मिळवायचे आणि पुन्हा गावाकडे जायचे असा या दोघांचा मानस होता. भायखळा येथील सुक्या मेव्याचा व्यवसाय करणारे दीपेन टेडिया यांच्या दुकानावर या आरोपींची नजर गेली. या दुकानात चोरी केल्यास मोठा माल हाती लागेल असा त्यांचा समज होता.
त्यानुसार आरोपींनी दुकानात जाण्यासाठी दुकानाच्या मागे असलेल्या गटारातून भुयारी मार्ग काढला. तीन दिवस या आरोपींनी हा भुयारी मार्ग खोदून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानात असलेली तिजोरी तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना ही तिजोरी तोडता आली नाही. त्यामुळे आरोपींनी एका कपाटात असलेली दीड लाखांची रोख रक्कम ४० हजारांची चिल्लर आणि ५० हजारांचे काजू आणि बदाम घेऊन तिथून पळ काढला. चोरीचा हा प्रकार दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.