चिनी मोबाईल तज्ज्ञांना ‘भारत छोडो’ची नोटीस, कंपनीची हायकोर्टात धाव
मोबाईल तयार करणाऱ्या चीनमधील कंपनीच्या दमणमधील प्रकल्पातील 50 मोबाईल तज्ज्ञांना भारत सोडण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. याविरोधात कंपनीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून भारत सरकारने केलेली कारवाई अयोग्य असून संबंधित तज्ज्ञांकडील बिझनेस व्हिसाची मुदत संपलेली नसताना ही कारवाई केल्याचे कंपनीच्या वकिलांनी हायकोर्टातील याचिकेत म्हटले आहे.
चीनमधील पॅसिफिक सायबर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे दमण येथे कार्यालय आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत काम सुरु असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या कार्यालयातील कामासाठी चीनमधील 60 मोबाईल तज्ज्ञ सध्या भारतात आहे. या मोबाईल तज्ज्ञांनी तातडीने भारत सोडावे, अशी नोटीस विदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाने (एफआरआरओ) बजावली आहे. ‘4 डिसेंबर रोजी पॅसिफिक सायबर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडच्या दमण कार्यालयातील पाहणीदरम्यान 60 मोबाईल तज्ज्ञ मशीनवर काम करताना आढळले. हे बिझनेस व्हिसा नियमाचे उल्लंघन असून त्यांनी तातडीने देश सोडावा’, असे नोटिशीत म्हटले आहे.
‘एफआरआरओ’च्या नोटिशीला कंपनीने हायकोर्टात आव्हान दिले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, यातील काही मोबाईल तज्ज्ञांच्या व्हिसाची मुदत 20 डिसेंबर, काहींची मुदत 27 डिसेंबर आणि काहींची मुदत मे 2019 पर्यंत आहे. कंपनीचे वकील नुशेर कोहली यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. सारंग कोटवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. या याचिकेवर नाताळच्या सुट्टीपूर्वी सुनावणी घ्यावी, अशी विनंती वकिलांनी न्यायालयाला केली आहे.