चिखलीत सलग चार दिवस जनता कर्फ्यू, ग्रामस्थांचा निर्णय
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहून चिखली ग्रामस्थांनी आजपासून (गुरुवार) रविवार ( दि. 12) पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज पहिल्या दिवशी संपूर्ण चिखली गाव आणि परिसरात बंद पाळण्यात आला. महापौर आणि आयुक्तांच्या गुरूवार आणि रविवार जनता कर्फ्यु पाळण्याच्या आवाहानाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी शहरातील नागरिकांना प्रत्येक आठवड्यातील गुरूवार आणि रविवार जनता कर्फ्युचा दिवस असेल, त्याचे पालन सर्वांनी करावयाचे आहे, असे आवाहन केले होते. त्यानुसार चिखली ग्रामस्थांनी आजपासून सलग चार दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला. सकाळपासूनच भाजीपाला आणि किराणामालासह अन्य सर्व दुकाने बंद होती. दूध विक्री सकाळी 7 ते 9 पर्यंत सुरु होती. मेडिकल दुकाने सकाळी 9 ते दुपारी 12 यावेळेत सुरु होती. तसेच, सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत मेडिकल दुकाने सुरु ठेवण्यास सवलत देण्यात आली आहे. याशिवाय सर्व दवाखाने आणि रुग्णालयांना जनता कर्फ्यूतून वगळण्यात आले आहे.
चिखली ग्रामस्थ आणि एक गाव एक शिवजयंती उत्सव समितीने गुरुवार (दि.9) ते रविवार (दि. 12) या कालावधीत कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आजपासून चिखली गावठाणासह कुदळवाडी, जाधववाडी, साने वस्ती, नेवाळे वस्ती, सोनावणे वस्ती, मोरेवस्ती, साने चौक, पवार वस्ती, ताम्हाणे वस्ती, पाटील नगर आदी भागात कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवले आहेत.