चिखलीतील गायरान जमिनीवरील वृक्षतोडीस शिवसेनेचा विरोध
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांचे निवेदन
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिखली गायरान गट नं. १६५४ येथील १ हजार ५२७ वृक्ष तोडण्याचा निर्णय उद्यान विभागाने घेतला आहे. प्रशासनाकडून जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी वृक्षांची कत्तल केली जात आहे. या वृक्षतोडीला स्थगिती मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी अनेक मोकळ्या जागा शिल्लक आहेत. मात्र, तरीही वृक्षतोड करुन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा घाट घातला जात आहे. शहरात प्रचंड प्रमाणात बांधकाम व्यावसायिक उद्यान विभागाला हाताशी धरुन वृक्षतोड करीत आहेत. त्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. यावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर हे डोळेझाकपणा करीत आहेत. याबाबत आपण लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी उबाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.