चिंता करू नका, हेही चित्र बदलेल
- माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी वर्तविले भाकित
पुणे – लोकांना आज चांगले पर्याय, चांगले नेतृत्त्व दिसत नाही. त्यामुळे जनतेत अस्वस्थता आहे. मात्र, आणीबाणीच्या काळातही हीच परिस्थिती होती. त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकांतून जनला दलाचा नवा पर्याय निर्माण झाला. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीवरून फार चिंता करू नका. हेही चित्र बदलेल, असे भाकित माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.
पुण्यात एका कार्यक्रमाच्या पुस्तक प्रकाशन समारंभात पवार यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर बोट ठेवत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “लोकांना स्वप्नात गुंतवण्याचा प्रकार होत आहे. नोटाबंदी, गोहत्येचा प्रश्न, वाढती कर्जबाजारपणा, जम्मू काश्मिरमधील अस्थिरता या विषयावरून पवार यांनी मोदी सरकारवर निशाला साधला. सध्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. आता पुढे काय होणार, नवा पर्याय निर्माण होईल की नाही, अशी चिंता निर्माण होत आहे.’
नोटबंदीचा निर्णय पंतप्रधानांना घेताच नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरच्या मान्यतेनंतर हा निर्णय घेतला जातो. मात्र, तशी परवानगी न घेता परस्पर हा निर्णय घेण्यात आला. यानंतर दहशतवाद, नक्षलवाद संपेल आणि शांतता प्रस्थापित होणार असल्याचे घोषित करण्यात आले. मात्र आज काश्मिरचा प्रश्न पूर्वीपेक्षा चिंताजनक झाला आहे. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला आहे. मुलांना शिक्षण अर्धवट सोडावे लागत आहे. त्यातूनच मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये रोष वाढला आहे. आता त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे पवार यांनी सांगितले. तसेच, आसामच्या निर्वासितांचा प्रश्न उभा राहिला. 40 लाख लोकांना बेघर सोडून चालणार नाही. त्यासाठी जागतिक पातळीवरून हा प्रश्न अन्य देशांशी संवादाने सोडविणे आवश्यक असल्याचे पवार यांनी म्हटले.
आरक्षणावरून सामंजस्याने निर्णय व्हावा
मराठा आरक्षणावरून गावागावांमध्ये एकमेकांविषयी आकस निर्माण होत आहे. त्यामुळे सामाजिक ऐक्य बिघडले आहे. ही परिस्थिती चिंता करण्यासारखी आहे. त्यावरून पूर्वीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षणाचा निर्णय घेणे गरजेचे आहे. त्यावर लोकांचा विश्वास दिसत नाही. त्यासाठी ठोस कृती आवश्यक असल्याचे शरद पवार यांनी सांगितले