चलो इनकी करे विदाई, भाजपाई और महंगाई, काँग्रेसचा नारा
मोदी सरकार जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवाकरातंर्गत (जीएसटी) आणत नाही, तोपर्यंत काँग्रेससह विरोधी पक्षांचे जनआंदोलन सुरूच राहील, असा इशारा काँग्रेसने आज दिला. पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ आज विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी मोदी सरकार व भाजपावर हल्लाबोल केला. रूपया सध्या आयसीयूत आहे, पण हे सरकार आपल्याच धुंदीत जगत असल्याची टीका त्यांनी केली.
सरकार सत्तेवर येऊन ५२ महिने झाले आहेत. आता त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे. आता अच्छे दिन कधी येणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपाचे आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. जनता त्यांना निरोप देईन. चलो इनकी करे विदाई, भाजपाई और मंहगाई, अशा शब्दांत सुरजेवाला यांनी भाजपाला टोला लगावला.
हे सरकार सर्वसामान्यांच्या कमाईची लूट करत भाजपाच्या जाहिरातीवर ते पैसे खर्च करत आहे. देशाचे संविधान पायदळी तुडवले जात आहे. अहंकारी आणि निरंकुश सरकार ५० वर्षे सत्तेवर राहण्याचा दावा करत आहे. भारताला उत्तर कोरिया होऊ देणार नाही, असे म्हणत भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या वक्तव्याचा सुरजेवाला यांनी समाचार घेतला. शाह यांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत २०१९ नंतर भाजपा ५० वर्षे सत्तेत असेल, असा विश्वास व्यक्त केला होता.