breaking-newsराष्ट्रिय
घटनात्मक नैतिकतेचे पालन करण्याचे राष्ट्रपतींचे नागरिकांना आवाहन
घटनात्मक पदांवर असणाऱ्या व्यक्ती, समाजधुरीण आणि नागरिकांनी घटनात्मक नैतिकतेचे पालन केले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी केले. संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना ते बोलत होते.
हक्कांचा खरा स्रोत हे कर्तव्य आहे, हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे कोविंद यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा उल्लेख करून सांगितले.
घटनात्मक नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित करताना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की, घटना हीच सर्वोच्च आहे आणि घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब करणे हे त्याचे सार आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. त्यामुळे घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती, समाजधुरीण आणि सर्वसामान्य नागरिकांनी घटनात्मक नैतिकतेचे पालन करणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.