breaking-newsराष्ट्रिय

गौरी लंकेश आणि पानसरेंची हत्या एकाच पिस्तुलाने

  • कर्नाटक एसआयटीची माहिती.

 
बंगळूर – पत्रकार-सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश आणि गोविंद पानसरे व एम.एम.कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्येसाठी एकच पिस्तुल वापरण्यात आल्याचे न्यायवैद्यक अहवालातून स्पष्ट झाल्याची माहिती कर्नाटकच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दिली आहे.

गौरी हत्या प्रकरणी कर्नाटक एसआयटीने आतापर्यंत सहा संशयितांना अटक केली. त्यापैकी अलिकडेच अटक करण्यात आलेला परशुराम वाघमारे हा संशयितच गौरी यांचा मारेकरी असल्याचा दावा एसआटीकडून करण्यात आला. त्यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल अजून एसआयटीच्या हाती लागलेले नाही. गौरी, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येमागे सुमारे 60 सदस्य असणारी एक निनावी संघटना आहे. या संघटनेचे अस्तित्व महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात आणि गोवा या पाच राज्यांत आहे.

हिंदू जागृती समिती, सनातन संस्था यांसारख्या संघटनांमधून त्या निनावी संघटनेसाठी सदस्य गोळा करण्यात आले. अर्थात, हिंदू जागृती समिती आणि सनातन संस्थेचा हत्या प्रकरणांशी थेट संबंध नाही, असे एसआयटीकडून स्पष्ट करण्यात आले. त्या दोन्ही संघटनांनी याआधीच हत्या प्रकरणांशी कुठला संबंध असल्याचा इन्कार केला आहे.

महाराष्ट्राच्या कोल्हापुरात फेब्रुवारी 2015 मध्ये पानसरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये कर्नाटकच्या धारवाडमध्ये कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली. तर मागील वर्षी 5 सप्टेंबरला गौरी यांची त्यांच्या बंगळूरमधील घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. एसआयटीने संशयितांकडून एक डायरी जप्त केली. त्यातूून संशयितांच्या हिट लिस्टवर अभिनेते-नाटककार गिरीश कर्नाड, के.एस.भगवान आणि बी.टी.ललिता नाईक हे साहित्यिक, विचारवंत सी.एस.द्वारकानाथ आणि वीरभद्र चन्नमल्ला स्वामी आदी असल्याचे स्पष्ट झाले. संशयितांच्या हिट लिस्टवर असणारे हिंदुत्वविरोधी विचारांसाठी ओळखले जातात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button