गोपाळ शेट्टींना माफी मागायला लावण्यामागे भाजपाचे मतपेटीचे राजकारण-शिवसेना
भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ख्रिश्चनांनी सहभाग घेतला नव्हता असे वक्तव्य केले होते. तसेच भारताला हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्र लढा देऊन स्वातंत्र्य मिळवून दिले असेही त्यांनी म्हटले होते. ख्रिश्चनांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गोपाळ शेट्टींना माफी मागावी लागली. त्यांनी सुरूवातीला राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली होती. मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यावर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. आता गोपाळ शेट्टी यांची बाजू घेत शिवसेनेने भाजपावर टीकेचे ताशेरे झाडले आहेत. ख्रिश्चन समाजाच्या मतपेटीवर डोळा ठेवून भाजपाने गोपाळ शेट्टींना माफी मागायला लावली असाही आरोप शिवसेनेने केला आहे.
गोपाळ शेट्टींना भाजपाने माफी मागायला लावली त्यामुळे भाजपाचा निधर्मी चेहेरा समोर आला आहे अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे. ख्रिश्चनांबाबत गोपाळ शेट्टी यांनी जे वक्तव्य केले त्यात त्यांचे काय चुकले? त्यांच्या वक्तव्यामुळे ख्रिश्चन समाज जेवढा भडकला नसेल तेवढे आपले विविध राजकीय पक्षांचे झगेवाले भडकले आहेत अशीही टीका सामनातून करण्यात आली आहे.
अग्रलेखात काय म्हटले आहे?
‘देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात हिंदू आणि मुस्लिम खांद्याला खांदा लावून लढले होते. मात्र इंग्रजांचे देशावर राज्य असल्याने ख्रिश्चनांचा या लढय़ात मोठय़ा प्रमाणावर सहभाग नव्हता.’ या वक्तव्यामुळे ‘ख्रिश्चन’ समाज जेवढा भडकला नसेल तेवढे आपले विविध राजकीय पक्षांचे झगेवाले भडकले आहेत; कारण इथे ख्रिस्ती बांधवांच्या प्रेम-आदराचा विषय नसून सरळसरळ मतपेटीचा विषय आहे; म्हणून गोपाळ शेट्टी यांना ‘गुन्हेगार’ ठरवून हल्ले केले गेले. प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार ख्रिश्चनांवरील वक्तव्यावरून भाजपच्या दिल्लीतील सर्वोच्च हायकमांडने गोपाळरावांना झापले व माफी मागायला लावली. या दाबदबावामुळे भावनाविवश शेट्टी हे खासदारकीचा राजीनामा द्यायला निघाले.
माझ्या ‘वाणी स्वातंत्र्यावर’ अशी गदा येत असेल तर नको ते पद, अशी भूमिका शेट्टी यांना घ्यावी लागली. यावरून त्यांचा किती मानसिक छळ झाला असेल याची कल्पना येईल. हिंदुत्ववादी ‘भाजप’ राजकारणासाठी ‘सेक्युलर’ होत आहे व सर्वच धर्माचे लोक त्यांना हवे आहेत. त्यामुळे अयोध्येत रामजी कायमचे वनवासात गेले तरी चालतील. पालघरची लोकसभा निवडणूक येनकेनप्रकारे जिंकावी यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसईतील चर्चेस व मिशनऱयांच्या पायऱया झिजवल्या. तोसुद्धा एक राजकीय कावेबाजपणाच होता व तेथील ख्रिश्चन बांधवही त्या कावेबाजपणास भुलला हे आता मान्य करावे लागेल.