गुजरात दंगल: बाबू बजरंगीला जन्मठेप; माया कोडनानी निर्दोष
अहमदाबाद: २००२ मध्ये नरोदा पाटिया येथे झालेल्या हत्याकांड प्रकरणात अहमदाबाद उच्च न्यायालयाने आरोपी बाबू बजरंगीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर, गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या हत्याकांडातील १० पैकी आठ जणांना दोषी ठरविण्यात आले असून दोन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नरोदा पाटिया हत्याकांड प्रकरणी बाबू बजरंगीसह हरेश छारा आणि सुरेश लंगडालाही दोषी ठरविण्यात आले आहे. १६ वर्षापूर्वी, म्हणजे २८ फेब्रुवारी २००२ रोजी अहमदाबाद येथे नरोदा पाटिया परिसरात सर्वात मोठा नरसंहार झाला होता. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेस जाळण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये दंगल उसळली होती. दंगलखोरांनी नरोदा पाटिया परिसराला टार्गेट करून या भागात आगी लावल्या होत्या. या हल्ल्यात तब्बल ९७ लोक ठार झाले होते, तर ३३ जखमी झाले होते. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला होता. ऑगस्ट २००९ पासून नरोदा पाटियाचा खटला सुरू झाला होता. या खटल्यात ६२ आरोपी होते.