गणेश तलावात माशांचा मृत्यू ; महापालिकेचे दुर्लक्ष
पिंपरी – निगडी प्राधिकरणातील सेक्टर २३ मधील गणेश तलावातील पाण्याची पातळी खलावली आहे. तसेच दूषित पाणी आल्याने माशांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
आकुर्डीत रेल्वे स्थानकाजवळ गणेश तलाव आहे. या तलावातील गाळ अनेक वर्षे काढला गेलेला नाही. या तलावात चित्रबलाक, खंड्या, वारकरी, बगळे असे विविध पक्षी मोठ्या प्रमाणावर असतात.
पाण्याची पातळी कमी झाल्याने या तलावात चित्रबलाक आले होते. जलचरांचा जीव धोक्यात आला आहे. त्यानंतर उपमहापौर शैलजा मोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. गाळ तातडीने काढावा, जलचरांचे संवर्धन करावे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उद्यान विभागास तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, दूषित पाण्यामुळे तलावातील अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत. सकाळी आठच्या सुमारास अनेक मासे पाण्यावर तरंगत होते. ते खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षी एकत्रित झाले होते. गुरुवारी सकाळी तलावातील पाणी दूषित, गढूळ झाल्याचे दिसून आले. माशांचा मृत्यू होण्यास कोण जबाबदार आहे, याची तपासणी करावी, अशी मागणी पक्षीमित्र संघटनांनी केली आहे.