गंगा स्वच्छतेच्या सद्यस्थितीबद्दल सरकार अनभिज्ञ
नवी दिल्ली : गंगा नदीच्या स्वच्छतेबद्दल विचारणा करणाऱ्या एका आरटीआय अर्जाच्या उत्तरादाखल केंद्र सरकारने सद्यस्थितीबद्दल अनभिज्ञता व्यक्त केली आहे. सरकारने गंगेच्या सफाईवर आतापर्यंत 3800 कोटी रुपये खर्च केले आहेत. गंगेच्या स्वच्छतेसाठी मोहीम सुरू करून अनेक वर्षे उलटून गेली आहेत. परंतु सरकारने सफाईच्या नावाखाली केवळ काही घाट चमकविले आहेत. गंगा नदीच्या घटत्या जलपातळीबद्दल सरकारकडे कोणतेही उत्तर नाही.
गंगा नदीत जमा झालेला गाळ हटविण्यासाठी सरकार कोणतीच उपाययोजना हाती घेत नाही. गाळ हटविल्याशिवाय जलमार्ग विकसित करणे अशक्य असल्याचे उद्गार गंगा स्वच्छतेसाठी कार्य करणाऱया जयंती यांनी काढले. आतापर्यंत गंगा नदीची किती स्वच्छता झाली, याची माहिती माहिती अधिकार अर्जाच्या माध्यमातून मागविली होती, परंतु सरकार याबद्दल कोणतीच आकडेवारी सादर करू शकले नसल्याचे आरटीआय अर्जदार तसेच पर्यावरणतज्ञ विक्रम तोगडे यांनी म्हटले आहे.