खेळाडुंचा विश्वास : महाराष्ट्र यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत वर्चस्व राखणार!
गुवाहाटी, आसाम । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
महाराष्ट्राचे खेळाडू गुवाहटी येथे सुरु असलेल्या तिस-या खेलो इंडिया युथ क्रीडा स्पर्धेत आपले वर्चस्व राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या (दि.१०) औपचारिक उद्घाटन होणा-या स्पर्धेत महाराष्ट्राने २० पैकी १९ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला आहे. यातील कबड्डी, जिम्नॅस्टिकमधील महाराष्ट्राच्या मोहिमेस गुरुवारपासून सुरवात झाली आहे.
महाराष्ट्र या स्पर्धेत लॉन बॉल या खेळात सहभागी होणार नाही. हा
एकमेव खेळ वगळता अन्य सर्व खेळात महाराष्ट्र वर्चस्व राखणार असा विश्वास पथक
प्रमुख विजय संतान यांनी स्पर्धेच्या औपचारिक उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त
केला. महाराष्ट्राचे एकूण ५९० खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावणार आहेत. घरच्या
मैदानावर पुण्यामध्ये गेल्या वर्षी महाराष्ट्राने विजेतेपद मिळविले होतो. या वर्षी
देखील महाराष्ट्र आपले वर्चस्व राखणार असल्याचे संतान यांनी सांगितले.
गतवर्षी महाराष्ट्राने एकूण २२७ पदकांसह विजेतेपद मिळविताना ८५ सुवर्ण, ६१ रौप्य, ८२ कांस्य पदके मिळविली होती. यामध्ये महाराष्ट्राला जलतरणात सर्वाधिक ४२ पदके मिळाली होती. यामध्ये १८ सुवर्ण, १४ रौप्य, १० कांस्यपदकांचा समावेश होता. त्यांना जिम्नॅस्टिकमधील (१४, १३, १२) ३९ पदके, तर, मैदानी स्पर्धेतील ३३ पदकांची (१३, ८, १२) जोड मिळाली होती. बॉक्सिंगमध्येही २३ पदके मिळाली होती. गेल्या वर्षातील अपयशाने महाराष्ट्राच्या मुली कबड्डीसाठी पात्र ठरलेल्या नाहीत. हाच गत आणि या वषार्तील महाराष्ट्राच्या सहभागातील फरक आहे.
महाराष्ट्राच्या पदकांची संख्या वाढणार!
यंदाच्या खेलो इंडिया युथ क्रीडा स्पर्धेत सायकलिंग क्रीडा स्पर्धेचा नव्याने समावेश झाला असून, यातील ट्रॅक आणि रोड रेस या दोन्ही प्रकारात महाराष्ट्राच्या मुला मुलींचा सहभाग असणार आहे. स्थानिक व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंची उंचावणारी कामगिरी पाहता या खेळाडूंकडून खेलो इंडिया स्पर्धेत पदकांची कमाई होणार असल्याची खात्री असल्यामुळे यंदा महाराष्ट्राची पदके वाढतील, असे विजय संतान यांनी स्पष्ट केले.