breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

खराब रस्त्यांमुळे होणारा उशीर यापुढे एसटीकडून जाहीर

प्रवाशांच्या रोषावर तोडगा; सूचना फलकाद्वारे माहिती पुरवणार

उशिराने सुटणाऱ्या एसटी बसगाडय़ांमुळे स्थानकांवर ताटकळत बसलेल्या प्रवाशांना मनस्ताप होतो. त्यामुळे सतत शाब्दिक रोषाचा सामना स्थानक कर्मचाऱ्यांना करावा लागतो. उशिराचा जाब विचारणाऱ्या प्रवाशांना रस्त्यांच्या परिस्थितीची कल्पना नसल्याने यापुढे एसटी विलंबास रस्ते जबाबदार असल्यास ते स्थानकांवरील सूचना फलकावर नमूद करण्यात येणार आहेत.

उशिरा सुटणाऱ्या एसटी बस फेऱ्यांबाबतीत प्रवाशांकडून एसटी महामंडळाकडे तक्रारी आल्या आहेत. त्याची दखल घेण्यात आली असून एसटी प्रशासनाच्या कक्षेबाहेरील कारण असल्यास ते सूचना फलकावर लिहिण्यात येणार आहे. यात रस्त्यांची यादीही दिली जाणार आहे.

एसटी स्थानकातून सुटणाऱ्या गाडय़ा काही वेळा बऱ्याच उशिराने सुटतात. एखाद्या अन्य मार्गाने एसटी बस स्थानकात येऊन दुसऱ्या मार्गावर जात असल्यास गाडीला विलंब होतो. मार्गस्थ होणारी बस उशिराने आल्यास प्रवाशांनाही निश्चित केलेल्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर होत असल्याने त्यांचे नुकसान होते. त्यातून काही वेळा प्रवाशांच्या रागाचा उद्रेकही होतो.

प्रवाशांच्या रोषावर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. बस स्थानकातून सुटणाऱ्या फेऱ्या वेळेवरच सुटल्या पाहिजेत, असे निर्देश सर्व एसटी विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत. याशिवाय आपल्या विभागाच्या अन्य विभागांत जाणाऱ्या फेऱ्या वेळेवर सुटतात किंवा नाही याबाबत खातरजमा करणे व उशिरा सुटणाऱ्या का उशिरा सुटतात त्याचा अभ्यास करण्याच्या सूचनाही नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.

होणार काय?

खराब रस्ते व रस्तादुरुस्तीचे काम या प्रशासनाच्या कक्षेबाहेरील कारणांमुळे बस फेऱ्या उशिरा सुटत असल्यास किंवा दीर्घकालापर्यंत अडचणींचे निराकरण होणार नसेल तर अशा फेऱ्यांच्या वेळेची पुनर्बाधणी करण्यास एसटी विभागांना सांगण्यात आले आहे. मात्र तरीही खराब रस्त्यांमुळे विलंबाने होणाऱ्या फेऱ्यांबाबत प्रवाशांना सूचना फलकाद्वारे माहिती दिली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button