breaking-newsपुणेमहाराष्ट्र

खबरदार, पावसाळ्यात फोन बंद ठेवाल तर

 

  • अधिकाऱ्यांना पडणार महागात : आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासनाचा निर्णय

पुणे- पावसळ्यात शहरात निर्माण होणारी आपत्तीजनक स्थिती लक्षात घेऊन या दिवसांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या परिमंडळ, क्षेत्रीय कार्यालय तसेच महापालिकेच्या संबधित मुख्य कार्यालयाच्या प्रमुखांनी आपले फोन बंद ठेऊ नयेत, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच सुट्टीच्या दिवशीही अधिकाऱ्यांनी तयार राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

शहरात दरवर्षी पावसळ्यात नाले तुंबणे, रस्त्यावर पाणी साचणे, वस्त्यांमध्ये पाणी घुसणे, खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या भागात पाणी घुसणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. ते रोखण्यासाठी तसेच अशा घटना घडल्यास पीडितांना तत्काळ मदत आणि उपाययोजनेसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर 24 तास कार्यरत असलेले आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू ठेवण्यात येतात. मात्र, असे प्रकार पालिकेच्या सुट्टीच्या दिवशी घडले, की फक्‍त अग्निशमन दल आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी उपस्थित असतात. तर या व्यवस्थापनाची जबाबदारी असलेले अधिकारी सुट्टीदिवशी आपले फोन बंद ठेवतात. त्यामुळे नागरिकांना तातडीची मदत मिळत नाही. परिणामी, नागरिक तसेच लोकप्रतिनिधी संतप्त होतात. शिवाय, घटनास्थळी पाहणीसाठी जाणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना रोष सहन करावा लागतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपला फोन 24 तास सुरू ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना आढावा बैठकीतच देण्यात आल्या. ज्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचे फोन बंद असल्याच्या तक्रारी येतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

  • व्हाटस्‌ ऍप ग्रूपवरून लक्ष
    शहरातील आपत्तीजनक स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने व्हाटस्‌ ऍप ग्रूप केला आहे. त्यात सर्व विभाग प्रमुख, क्षेत्रीय अधिकारी, उपायुक्तांचा समावेश आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास तत्काळ सर्व विभागांना एकाच वेळी माहिती देऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button