क्रांतिकारी दामोदर चापेकर यांच्या नावाचे टपाल तिकीट प्रसिद्ध करावे – श्रीरंग बारणे
पिंपरी: दामोदर हरी चापेकर, बालकृष्ण हरी चापेकर आणि वासुदेव हरी चापेकर या क्रांतिकारी चापेकर बंधूंनी केलेला त्याग आणि शौर्य लक्षात घेऊन क्रांतिकारी दामोदर हरी चापेकर व बंधूंच्या नावाचे टपाल तिकीट प्रसिद्ध करावे. यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी याआधी लोकसभेत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. परंतु केंद्र सरकारकडून याबाबतची कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे बारणे यांनी संचार राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनोज सिन्हा यांना दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात भेटून क्रांतिकारी दामोदर हरी चापेकर व बंधूंच्या नावाने टपाल तिकीट लवकरात लवकर प्रसिद्ध करावे अशी मागणी केली.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
सन 1896-97 मध्ये पुण्यात प्लेग या रोगाने थैमान घातले असताना तत्कालीन ब्रिटीश अधिकारी वाल्टर चार्ल्स रॅण्ड आणि त्याचे सहकारी हे प्लेग बाधित नागरिकांना पुण्यातून जबरदस्ती हाकलून देत त्यांच्याशी वाईट पद्धतीने वागत होते. त्यांच्या अशा वागण्याला लगाम घालण्याचे व त्यांना धडा शिकविण्याचे दामोदर हरी चापेकर, बालकृष्ण हरी चापेकर आणि वासुदेव हरी चापेकर या क्रांतिकारी चापेकर बंधूंनी ठरविले व 22 जून 1897 मध्ये दामोदर हरी चापेकर यांनी तत्कालीन ब्रिटीश अधिकारी वाल्टर चार्ल्स रॅण्ड या अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील हा पहिला क्रांतिकारी धमाका ठरला. देशासाठी एकाच कुटुंबातील तीन बंधूंनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशी ही इतिहासातील एकमेव घटना आहे.
या इतिहासाचा खुलासा देत श्रीरंग बारणे यांनी नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशन काळात संचार राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनोज सिन्हा यांची दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन क्रांतिकारी दामोदर हरी चापेकर व बंधूंच्या नावाचे टपाल तिकीट लवकरात लवकर प्रसिद्ध करावे, अशी मागणी केली असल्याचे बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.