कोल्हापूरमध्ये 11 ते 21 सप्टेंबर दरम्यान दहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर
करोनाच्या विळख्यात कोल्हापूर जिल्हा हा अडकत चालाल आहे. एवढी गंभार परिस्थिती असताना देखील जिल्हा प्रशासनावर मास्क न लावण्याऱ्या लोकांमुळे दंड आकरण्याची वेळ आली. जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन, जिल्ह्यात प्रवेशबंदी, मास्क न लावल्यास पाच हजार रुपये दंड अशी कठोर पावले उचलण्यात आल्यानंतर आता दहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर झाला आहे.
करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर शहरात ११ ते २१ सप्टेंबर दरम्यान दहा दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रशासनाचे कोणतेही निर्बंध नसतील, जनतेनेच हा कर्फ्यू यशस्वी करावा असे आवाहन एका संयुक्त बैठकीत करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचा संसर्ग प्रचंड वाढत आहे. जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांचा एकूण आकडा तीस हजारांवर पोहचल्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा एकदा कर्फ्यू जाहीर करण्यासंदर्भात आज दोन बैठका झाल्या. त्यामध्ये प्रथम कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सची बैठक झाली. या बैठकीत सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय झाला. १० ते १६ सप्टेंबर पर्यंत सूचवण्यात आलेल्या या जनता कर्फ्यूला कापड दुकानदारांनी जोरदार विरोध केला. यामुळे बैठकीत काही जण एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला.
कापड दुकानदारांनी बैठकीतून काढता पाय घेतल्यानंतर अखेर सहा दिवस कर्फ्यू पाळावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सायंकाळी महापालिकेत महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीत काहींनी जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली तर काहींनी त्याला विरोध केला. या पार्श्वभूमीवर ११ ते २१ सप्टेंबर असे दहा दिवस जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. पण महापालिका अथवा पोलिस प्रशासन यासाठी नागरिकांवर कोणतेही निर्बंध आणणार नाहीत, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. जनतेने स्वयंस्फूर्तीने हा जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन महापौर आजरेकर यांनी केले.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, चंदगड, गडहिंग्लज, पन्हाळा, राधानगरी आणि भुदरगड या तालुक्यांत आधीच जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आता शहरातही तो लागू केल्यामुळे त्याला काही प्रमाणात विरोध सुरू झाला आहे. खासदार संभाजीराजे यांनी या कर्फ्यूला कडाडून विरोध केला. सतत कर्फ्यू जाहीर करणे म्हणजे सामान्य जनतेच्या पोटाला चिमटा घेण्याचा प्रकार आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान दहा दिवसांच्या या कर्फ्यूला लोकं कशापद्धतिने प्रतिसाद देतील हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.