कोल्हापूरचे जवान संग्राम पाटील शहीद
कोल्हापूर – पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात मागील आठवड्यात जवान ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते. त्यानंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक जवान शहीद झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी भागात 16 मराठा पोस्टवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात निगवे खालसा येथील संग्राम शिवाजी पाटील यांना वीरमरण आले आहे. एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जवानाला वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शहीद जवान हवालदार संग्राम पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. संग्राम पाटील हे भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते.
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरू आहेत. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात असून शनिवारी सकाळी पाक लष्कराने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून अंदाधुंद गोळीबार केला. राजौरी जिल्ह्यातील नोशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातील जवान संग्राम शिवाजी पाटील शहीद झाले. जवान संग्राम पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा गावातील रहिवासी असून अठरा वर्षांपूर्वी ते लष्करात दाखल झाले होते. सैन्यदलातील ‘१६ मराठा बटालियन’मध्ये ते कार्यरत होते. संग्राम यांची १७ वर्ष सेवेची मुदत गेल्या वर्षी संपली होती. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष मुदत वाढवून घेतली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांनी देशाच्या रक्षणासाठी अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या प्राणांची बाजी लावली. पाकिस्तानने 13 नोव्हेंबरला शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला होता. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र या गोळीबारात महाराष्ट्राने आपले वीरपुत्र गमावला.