कोरोना विषाणूचा परिणाम लोकांच्या खिशालाही,भाज्या, फळे, दूधासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या
कोरोना विषाणूचा परिणाम आता लोकांच्या खिशावर होऊ लागला आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे महागाईमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात भाज्या, फळे, दूधासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. स्वत: सरकारने याची माहिती देत खाद्यपदार्थाचे दर मागच्या एका आठवड्यात आणि जनता कर्फ्यूनंतर वाढले असल्याचे सांगितले आहे.
ग्राहक मंत्रालयाच्या मते, गेल्या एका आठवड्यात डाळी, भाज्या आणि खाद्य तेलांच्या किमतीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारामध्ये ही वाढ सर्वात जास्त आहे. दिल्लीसह अनेक राज्यातील बाजार ३१ मार्चपर्यंत बंद असल्यामुळे अन्य राज्यांतील पुरवठा आणि मागणीचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये आणखी वाढ होऊ शकते.
सरकारच्या किंमत देखरेख विभागाच्या म्हणण्यानुसार, डाळीचे दर पाच ते सहा रुपयांनी वाढले आहेत. गेल्या वर्षभराच्या तुलनेत तूर डाळीच्या किमतीत २० रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली असल्याचे आकडेवारी सांगते. एवढेच नाही तर गव्हाचे पीठ आणि तांदूळ यांच्या किमती देखील वाढल्या आहेत.
दरम्यान, खाद्य तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. मोहरीच्या तेलामध्ये ५ रुपयांनी वाढ झाली आहे. शिमल्यामध्ये मोहरीचे तेल १३० रुपयांवर पोहचले आहे. तर एका आठवड्यापूर्वी याचीच किंमत ११७ रुपये एवढी होती. तर, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यापुढे देखील खाद्यतेलांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.