कोरोनाचा 6 महिन्यांतील सर्वाधिक उच्चांक, 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद
नवी दिल्ली – देशात कोरोनाबधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. एकूण रुगांची संख्या 15 लाख 83 हजार 792 झाली आहे. यातच एका दिवसात रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात पहिल्यांदाच कोरोनाचे 52 हजार 123 रुग्ण सापडले आहेत. तर 24 तासात तब्बल 775 लोकांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण मृतांचा आकडा 35 हजारांच्या पलिकडे जात आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत 10 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
भारतात पहिला कोरोना रुग्ण 30 जानेवारी रोजी सापडला होता. त्यानंतर 1 लाख ते 5 लाख कोरोना रुग्णांची संख्या 146 दिवसात समोर आली. मात्र 5 ते 15 लाखांचा आकडा गाठण्यासाठी केवळ 32 दिवस लागले.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाचे 5 लाख 28 हजार 242 सक्रिय रुग्ण आहेत. तर, 34 हजार 968 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 10 लाख 21 हजार 611 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनाच्या आकडेवारीत जगभरात अमेरिका पहिल्या तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. कोरोनाचा संसर्ग जरी जास्त लोकांना होत असला तरी भारतात मृत्यूदराची टक्केवारी सर्वात कमी आहे. आणि रिकव्हरी रेट सर्वात जास्त असल्यानं काहीसा दिलासाही आहे.
देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना पश्चिम बंगालसह अनेकांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात महाराष्ट्रातही लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे.