कोंबड्यांच्याही मृत्यूमागे खलिस्तानी असे जाहीर करू नये म्हणजे मिळवले; सेनेचा भाजपला टोला
बर्ड फ्लूवरून शिवसेनेने भाजपची टांग खेचली आहे. ‘कोंबड्या, पक्षी मरून पडत आहेत त्या त्यांच्या रहस्यमय हत्याकांडातही खलिस्तानी, पाकिस्तानी, नक्षलवाद्यांचाच हात आहे असे भाजप प्रवक्त्यांनी जाहीर केले नाही म्हणजे मिळवले’ असं म्हणत शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत यांनी भाजप (BJP) प्रवक्त्यांना चांगलेच फटकारून काढले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपला चांगलाच सणसणीत टोला लगावण्यात आला आहे.
‘नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत असतानाच बर्ड फ्लूचे नवे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. शेतकरी सर्वच पातळ्यांवर अडचणीत आहेत. आभाळच फाटल्यावर ठिगळ तरी कुठे कुठे लावायचे हाच प्रश्न आहे. ‘बर्ड फ्लू’मुळे फक्त पक्षी व कोंबड्यांच मरत नाहीत, तर ग्रामीण भागातला कुक्कुटपालन करणारा शेतकरी, त्यांचे कुटुंबही मरत आहे याचे भान केंद्रातल्या व ज्या राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा फैलाव होत आहे तेथील राज्यकर्त्यांना आहे काय? संकटे रांगेत उभीच आहेत. विरोधकांनीही कोंबड्यांच्या रक्षणावर बोलावे. स्वतःच्या सुरक्षेवर नंतर बोलावे, असा टोला सेनेनं भाजपला लगावला आहे.
शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तानी, खलिस्तानी, चिनी, नक्षलवादी, माओवादी यांचा हात असल्याचे सरकारी मंडळींचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ज्या कोंबड्या, पक्षी मरून पडत आहेत त्या त्यांच्या रहस्यमय हत्याकांडातही खलिस्तानी, पाकिस्तानी, नक्षलवाद्यांचाच हात आहे असे भाजप प्रवक्त्यांनी जाहीर केले नाही म्हणजे मिळवले’ असा सणसणीत टोलाही भाजपला लगावण्यात आला आहे.