कैलाश खेर यांच्या गाण्याचेच झाले राजकारण!
नवी दिल्ली : ‘बदल रहा हैं देश, अब बदलेगी दिल्ली’… संगीतकार कैलाश खेर यांच्या या गाण्यातली दिल्ली बदलेल न बदलेल पण कैलाश खेर यांचे गाणे मात्र ‘बदलले’. राजकीय पक्षाच्या प्रचाराला तयार केलेल्या गाण्याचेच राजकारण झाल्याने उदि्वग्न कैलाश खेर यांनी ‘आता तर राजकारण सुरू झाले आहे.. पण मी त्यात पडणार नाही,’ असे उद्गार काढले.
त्याचे झाले असे की दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे गाणे तयार करण्याची जबाबदारी कैलाश खेर यांना देण्यात आली होती. त्यांनी ती पार पाडलीही, पण त्यापूर्वीच दिल्ली भाजपचे प्रमुख आणि गायक मनोज तिवारी यांनीही एक गाणे तयार केले आणि प्रदर्शितही करून टाकले. परिणामी कैलाश खेर यांचे गाणे मागे पडले.
‘आत तर राजकारण सुरू झाले आहे. राजकारण खूपच गुंतागुंतीचे असते त्यामुळे मला त्यात पडायचे नाही. मी अनेक प्रकल्पांसाठी हजारो गाणी लिहीली आणि संगीतबद्ध केली आहेत. भाजपसाठीही यापूर्वी अनेक गाणी लिहिली आहेत. पण आता केवळ तिवारींच्या गाण्याला महत्त्व मिळालं म्हणून मला वाईट वाटून घ्यायला नको,’ असे कैलाश म्हणाले. ते सध्या पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीतच आहेत.